शेत वाचवा अभियान’ देशातील 2.712 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचले; 7.17 लाख शेतकऱ्यांना खतांच्या समतोल वापराबाबत सजग करण्यात आले
नवी दिल्ली,
केंद्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील भारतीय कृषी संशोधन मंडळाने स्वतःच्या देशव्यापी ‘शेत वाचवा अभियानां’तर्गत लक्षणीयरित्या यशस्वी कामगिरी बजावली आहे. हे अभियान मृदा आरोग्य, खतांचा समतोल वापर तसेच शाश्वत शेतीवर अधिक लक्ष केंद्रित करते. ‘शेत वाचवा अभियाना’ने शेतकऱ्यांना तसेच इतर हितसंबंधीयांना शास्त्रीय पोषण व्यवस्थापनाविषयी शिक्षित करण्यासाठी विविध मंचाच्या माध्यमातून देशभरात एक सशक्त संपर्क प्रस्थापित केला आहे.
या अभियानांतर्गत आतापर्यंत एकूण 12,979 जागरुकता शिबिरे आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली असून त्यात 7.17 लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेण्यात आले आहे. क्षमता निर्मितीच्या उद्देशाने 3,145 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये 1,11,509 जण सहभागी झाले. तसेच हरित खते, जैविक खते आणि सेंद्रिय स्रोतांशी संबंधित 7,928 क्षेत्र प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उपस्थितांना या विषयांचे व्यावहारिक ज्ञान देण्यात आले.
मुलभूत स्तरावरील सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, पंचायती, सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या उत्साही सहभागासह 4,916 लोकप्रतिनिधी संमेलने आयोजित करण्यात आली. शेतीच्या साहित्याच्या पुरवठा साखळीची भूमिका लक्षात घेऊन, खतांच्या समतोल वापराबाबत जागरुकता पसरवण्यासाठी या साहित्याच्या विक्रेत्यांसोबत 9,609 चर्चांचे आयोजन करण्यात आले.
या अभियानाने शेतकरी समुदायांचा देखील वापर करून घेतला आणि शेतकरी उत्पादक संघटना(एफपीओज), स्वयंसहाय्यता गट आणि शेतकरी हितगट (एफआयजीज) यांच्या माध्यमातून 8,383 शेतकरी सदस्यांना जोडून घेतले. अधिक विस्तृत दृष्यमानतेसाठी, देशभरात 53,616 ठिकाणी फलक, भित्तिपत्रके आणि मोठे जाहिरातफलक यांसारखे जाहिरात साहित्य प्रदर्शित करण्यात आले. या विषयावरील 944 रेडिओ चर्चा तसेच 200 दूरचित्रवाणी/डिजिटल कार्यक्रम यांच्या समावेशासह 1,144 माध्यम प्रसारणांच्या मदतीने आवश्यक संदेश अधिक मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आला. समाज माध्यम मंचांचा वापर करून या विषयाची डिजिटल पोहोच 2.712 कोटी लोकांपर्यंत विस्तारण्यात आली.
मृदा चाचणी-आधारित पोषण व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे आणि रासायनिक खतांवरील अतिअवलंबित्व कमी करून मातीची सुपीकता सुरक्षित ठेवणे तसेच दीर्घकालीन कृषी शाश्वततेची सुनिश्चिती करणे ही या ‘शेती वाचवा अभियाना’ची उद्दिष्टे आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा